
सामाजिक कार्यकर्ते जीतम घरत यांनी गो ग्रीन इको टेक सोल्युशन कंपनीतून रासायनिक घनकचऱ्याची लावण्यात येणारी बेकायदा विल्हेवाट आणि शासनाचे परवानगी न घेता कंपनीचे करण्यात आलेले बेकायदा बांधकाम या विरोधात कारवाईसाठी संबंधित विभागांकडे तक्रार दिली होती.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार निकोले यांनी देखील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे त्यांच्याकडे या कंपनी विरोधात तक्रार केली होती. गो ग्रीन कंपनी विरोधातील तक्रारींच्या अनुषंगाने तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी प्रमोद लोणे हे गुरुवारी दुपार नंतर घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले असताना त्यांनी सोबत तक्रारदार जीतम घरत यांना देखील बोलावले होते.
जीतम घरत हे कंपनी आवाराच्या बाहेर थांबले असताना 20 ते 25 भाडोत्री गुंडांनी त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. आपल्यावर करण्यात आलेला हल्ला आणि मारहाण गो ग्रीन कंपनीचे संचालक राजेश पाटील आणि मुकेश पाटील यांच्या सांगण्यावरून बोईसर मध्ये या अगोदर बोईसर पोलिस ठाण्यात खून , खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आसलेल्या गुंडा कडून पूर्व नियोजित पद्धतीने कट घडवून मारहाण केल्याचा आरोप जीतम घरत यांनी केला आहे. तारापूर परिसरातील प्रदूषणाविरोधात लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्यामुळे मोठा संताप व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
