पालघर
डहाणू तालुक्यातील बाडापोखरण तलाठी सजा हद्दीतील ४ गुंठे जमिनीचे ४० गुंठ्यांमध्ये रूपांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार महसूल विभागातील तलाठी आणि स्थानिक दलाल राजेंद्र राऊत यांच्यातील संगनमताने झालेला होता सदर जागेचा फेरफार केवळ तांत्रिक घोळ नसून भ्रष्टाचाराचे उदाहरण म्हणून समोर आले होते. याबाबत नागपूर येथील अधिवेशनात आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित तलाठी सजा चे तात्कालीन तलाठी संतोष कोटनाके व मंडळ अधिकारी जोशना गमज्या यांना महसूल मंत्री बावनकुळे यांनी तात्काळ निलंबित केले आहे.
बाडापोफरण येथील गट क्र. ३८/४० ही जमीन जानकीबाई जैतू भंडारी यांच्या नावावर असताना या जमीनीचे क्षेत्र केवळ चार गुंठे होते. मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या चुकीच्या फेरफार नंतर याच जमीनीचे क्षेत्र बेकायदेशीर रित्या ४० गुंठे झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
याच भागातील प्रसिद्ध असलेला भुमाफिया राजेंद्र राऊत याच्या विरोधात वानगाव पोलीस ठाण्यात याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून राऊत हा न्यायालयाच्या कोठडीत आहे. राऊत याने जानकीबाई भंडारी यांच्या नावाशी त्याच्या आजीचे नाव असल्याचा गैरफायदा घेत, ती त्याची आजी असल्याचा खोटे कागद पत्रे तयार करून वारस म्हणून स्वतःचे नाव सात सातबाऱ्यांवर चढवले. मात्र या जमिनीच्या मूळ मालकांनी आक्षेप घेतल्यानंतर फेरफार मागे घेण्यात आला, पण गट क्र. ३८/४० वरील फेरफार रद्द करण्यात आलेला नसल्याने संबंधित फसवणूकिचा प्रकार हा उघडकीस आला.
